'अनोखं' मॉडेल : पांडवलेणीच्या पायथ्याला घ्या 'चंद्रा'ची अनुभूती, नाशिक महानगरपालिकेचा 'अद्भुत प्रताप'

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक : नाशिक महानगरपालिका हद्दीतील पांडवलेणीच्या पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांना रोजच चक्क 'चंद्रा'वरील खड्ड्यांसारखीच अनुभूती मिळत आहे. मात्र महानगरपालिकेच्या या 'प्रतापा'मुळे परिसरातील नागरिकांची अक्षरशः 'वाट' लागलीय. याबाबत आवाज उठविण्यासाठी नागरिकांनी 'MBP LIVE 24' शी संंपर्क साधला. 


खेडे की शहर ? रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, पाठदीप या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नाशिक महानगरपालिका हद्दीतील पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या एकता ग्रीन व्हॅलीच्या पुढील परिसरातील माऊलीनगर, धोंगडेनगर, विजयनगर, स्वप्नपूर्तीनगर मधील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. मोठ मोठ्या खड्यांचे साम्राज्य रस्तांवर पसरलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खड्ड्यांसारखी अनुभूतीच येथे मिळतेय, अशी अतिशयोक्तीची भावना नागरिकांमधून व्यक्त होतेय.  त्यामुळे हा भाग एखाद्या अतिमागास खेड्यातील आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

रस्ते दाखवा आणि बक्षीस मिळवा : या परिसरात रस्ते शोधून सापडत नाहीत. रस्ते दाखवा आणि बक्षीस जिंका अशी स्कीम राबवली तर कोणीही बक्षीस मिळवू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात ये-जा  करण्यासाठी साधा खडीकरणाचाही  रस्ता नाही. आधीच माती चा रस्ता त्यात पडलेले मोठे खड्डे यामुळे पावसाळ्यात तर डबक्याचे साम्राज्य असते.

अपघातांना निमंत्रण : आधिच माती असलेले रस्ते पावसात चिखलमय झालेत. या रस्त्यावरून चालतांना अनेक जण चिखलात  पाय घसरून तसेच वाहन घसरून पडत आहेत. अशा प्रकारे अपघात होणे ही नित्याची बाब बनले आहे. हात-पाय मोडणे, गाडीचे नुकसान होणे असे शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ येथील रहिवाशांवर येऊन ठेपलीय.

लाखोंचा कर अदा : या परिसरात  लाखो रुपये खर्च करुन  घर, बहूमजली इमारती उभ्या राहिल्या. ते लाखो रुपये मोजून लोकांनी खरेदी केल्या. महापालिकेचे  सर्व कर देखील अगदी वेळेवर भरले जातायेत. मात्र, महापालिकेकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.  मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते बांधले गेले नाहीत. सांडपाण्याची  विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या बांधून न दिल्याने रस्यावर पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. 



सोसायट्यांना तळ्याचे स्वरूप : गेल्या चार वर्षांपासून या भागातील नव वसाहतींमधील मननमहिरा रो हाऊसेस,  स्वामी अव्हेन्यू  अपार्टमेंट,  ईलिका पार्क, ओम साई प्लाझा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे.

शाळांची वाट बिकट : या भागात सेंट थॉमस बेथानी कॉन्व्हेंट स्कूल व पोदार इंटरनेशनल स्कूल आहे.  रस्त्यांच्या आभावामुळे व मोठ मोठ्या खड्यांच्या साम्राज्यामुळे ऑटोरिक्षा या परिसरात येत नाहीत. त्यामुळे मुलांना शाळेत जाणे जिकरीचे ठरत आहे. महिलांना तर जिव मुठीत घेऊन ही खडतर वाट रोजच चालावी लागतेय. चिमुकल्या मुलांनी या चिखलातून आणि खड्यांतून चालायचे कसे, हा प्रश्न उभा राहतो.


अंधाराचे साम्राज्य या परिसरात अंबड, सातपूर एमआयडीसी मधील कंपनीत काम करणारे शेकडो कामगार रहातात. त्यांना रात्री अपरात्री कामावरून ये-जा करावी लागते. आधीच रस्ते नाहीत् त्यात पथदीप देखील नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. अंधारात या रस्त्यांवरून जाणे मोठे जिकरीचे ठरत आहे. त्यातच या भागात बिबट्यांचा संचारही असतो. अंधारात एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांचा आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात या परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. परिणामी डेंगू, मलेरियासह विविध आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. या अनारोग्यामुळे मुलांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय.

आयुक्त साहेब आम्हालाबी शहरात घ्या !पायाभूत सुविधांचा अभाव आणि या
असुविधांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त व  बांधकाम विभागाचे शहर अभियंता  यांनी या समस्यांची तत्काळ सोडवणूक करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. नव्हे आम्हालाबी शहरा सारख्या सुविधा द्या आणि तुमच्यात घ्या, अशी हाकच प्रविण जाधव, मयूर पाटील, दिनेश परदेशी, अतुल देसले, निखिल खैरनार, पंकज पाटील, रावसाहेब पाटील, सचिन शेलार, गजबसिंग राजपूत, विजयसिंग जाधव, अनिकेत पाटील, मनोज जाधव आदी नागरिकांनी दिली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !