आपण फक्त फुलं 'उधळायला' मोकळे..

सार्वजनिक कार्यात काम करत असताना समाजासाठी मनापासुन काम करणाऱ्या लोकांपेक्षा 'लोकांसाठी' काम करतोय असं दाखवून आपली स्वतःची तुंबडी भरणारेच खूप दिसतात. मग ते कोणतेही क्षेत्र असो... 

आणि हिच माणसे समाजाचे म्होरके म्हणून वावरत असतात. त्यांचे 'चेले', 'पंटर' आपल्या या 'बॉस'च्या कर्तृत्वाच्या गाथा अशा काही सांगत असतात की आपण फुले उधळायला मोकळे..

काय शोकांतिका आहे ? आता गेला तो शाहू, फुले, आंबेडकरांचा जमाना. तीच खरी महापुरुष होती. आपण केवळ जयंती साजरी करायची. तिथेही त्यांचे आदर्श, तत्ववाद विसरून कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांची सोय करायला पहिलं महत्व..

मतांच राजकारण.. दुसरं काय ? मला कधीकधी खूप नवल वाटतं. विचारांची प्रगल्भता, दूरदृष्टीने समाज हितासाठी काही करावं, याची थोडीही जाण नसतांनाही.. 'मला पहा, फुले वाहा'.. याच इच्छेत काही नेते सदासर्वदा कसे काय असू शकतात..? हे ही एक कोडेच म्हणावे लागेल.

पैसा, दहशत, जुलूम यांच्या जीवावर शहर, संस्था ताब्यात घेणाऱ्यांना आपल्या पदाची गरिमा जर कळतच नसेल तर सामान्यांवर जुलूम अटळच आहे... लाचार पंटर, कार्यकर्त्यांना एखादा तुकडा फेकला तर दिवसभर तुमचा ढोल वाजवणारच आहेत... अगदी बोटे फुटेपर्यंत..

जर लोकांची जागृती नसेल, इच्छाच नसेल तर आपला जन्मच नरकातला आहे हेच लिखित असावं.. गुंड माणसे मंदिरात, अन् साधू दारात..

असं काही घडत असेल तर आपण कलियुगात आहोत हेच खरं.. अशाही स्थितीत  समाजासाठी झटणारी काही माणसे राजकारणात इतर क्षेत्रांत आहेत. सध्या तरी तीच काय थोडीफार आशा आहे.

- जयंत येलुलकर (अहमदनगर) 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !