'लॉकडाऊन'बाबत महाराष्ट्र सरकार घेणार 'हा' कठोर निर्णय

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक अजूनही नियम पाळताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकार आता 'कठोर' निर्णय घेणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

एकीकडे कोरोनाची व्याप्ती वाढत चालली असली तरी त्या तुलनेत मृत्युदर मात्र कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही, पण निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना घरीच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात आहेत. 

नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांनी करावा. त्यामुळेच रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. 

राज्यातील ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !