पोलिसांच्या आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण मागे
नाशिक - यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे अजूनही फरार आहे. त्याला अटक करावी, या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी शुक्रवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बसून आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली. मात्र सायंकाळी पोलिसांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चांगला केला असल्याचे रुणवाल जरे यांनी म्हटले आहे. पण बोठेला अटक कधी करणार याचे निश्चित उत्तर कोणीही देत नाही. रुणाल यांच्यासह त्यांची पत्नी, रेखा जरे यांच्या आई, आणि इतर सदस्य आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, उपोषणाची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि सहायक पोलिस निरीक्षक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जरे कुटुंबियांची भेट घेऊन तपासाची माहिती दिली. लवकरात लवकर अटक करू, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, काही झाले तरी आता बाळ बोठेला अटक झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार रुणाल जरे यांनी व्यक्त केला आहे.
तृप्ती देसाई देखील संतापल्या
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही रुणाल झरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ मोठे याला पारनेर न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तृप्ती देसाई यांनी रेखा हजारे यांच्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा देत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ मोठे याला अटक करा, त्याची मालमत्ता जप्त करा, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना देखील अटक करा अशी मागणी केली आहे.
मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान, राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री पाटील, अहमदनगर चे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील फरार आरोपी बोठेला अटक करण्यासाठी रुणाल जरे यांनी भेटून निवेदन दिले आहे. त्यावर, लवकरच पोलिस बोठेला पकडतील, असे आश्वासन देऊन तोपर्यंत उपोषण टाळन्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आब पोलिसांना राखता आली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांसह राज्याचे मंत्री देखील हतबल झाल्याचे दिसत आहे. परिणामी पोलिसांच्या अपयशामुळे मंत्र्याची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.