नाशिक - रस्त्यावर अडवून पोलिस वाहनधारकांना अडवून दंडात्मक कारवाईची भीती घालून चिरीमिरी उकळण्याचा उद्योग नित्याचा आणि सर्वत्रच होतो. शहरातील सुशिक्षित नागरिकांपासून ते ग्रामीण भागातील अल्पशिक्षित व अशिक्षित शेतकरी, सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास व फटका सहन करावा लागतो.
मात्र प्रवासी वाहनांची तपासणी करणे, चावी काढणे, टायरमधील हवा सोडणे असे अधिकार पोलिसांना नाहीत, असा लेखी खुलासा खुद्द पोलीस खात्याकडूनच करण्यात आलाय, हे विशेष. पाहुयात कोणी आणि काय केला आहे वाहनांच्या कागदपत्र तपासणीबाबत..
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागितलेल्या माहितीवरून सोलापूर जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेने केलेल्या लेखी खुलाशावरून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीच्या आधारे हे स्पष्ट होते.
होमगार्ड, पोलिस यांच्याकडून अशिक्षित वाहन चालक, शेतकरी, मजूर आणि शालेय विद्यार्थ्यांकडून गाडी अडवून काहीतरी दोष काढत अधिकार नसताना दंडाची भीती दाखवत पाचशे ते हजार रुपयांची बळजबरीने मागणी केली जाते.
वाहनांची चावी काढणे, वाहनांची हवा सोडणे किंवा वाहन पोलिस ठाण्यात नेऊन लावून पैसे उकळून नाहक त्रास, वेळेचा अपव्यय केला जातो. महत्त्वाच्या कामासाठी आठवडा किंवा महिन्यातून एकदा गावात येणाऱ्या शेतकरी आणि मजुरांकडून काबाडकष्ट करून मिळवलेले पैसे घेऊन पिळवणूक केली जाते.
वरिष्ठांकडे दाद मागा
आरटीओ ऑफिस किमान शिक्षणाची अट घालत वाहन चालकांना लायसेन्स देत नाही, त्यामुळे अशा अडचणींना सतत गरीब व कष्टकरी लोकांनाच जास्त त्रास होतो आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार कायद्यान्वये अर्ज दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, अशी पिळवणूक होत असेल तर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्याचे अधिकार सर्वसामान्य जनतेस आहेत. त्यांनी या अधिकाराचा वापर करायला हवा, असेही या क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींचे म्हणणे आहे. जेणेकरुन पिळवणूक होणार नाही.
IPS तेजस्विनी सातपुते यांनीही केली होती बंदी
पोलिसांनी कागदपत्रे तपासू नयेत असा थेट आदेशच तत्कालीन साताऱ्याच्या आणि सध्या सोलापूरच्या पोलीस अधीक्षक यांनी काढले होते. वाहनांची कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी ही पोलिसांची नाही. पोलिसांना इतर कामेही आहेत त्यांनी ती करावीत.
तसेच रस्त्यावर कुठल्याही पोलिसाने याबाबतीत पैसे मागितल्यास थेट माझ्याशी संपर्क करा, अशा सूचना देऊन त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची या पिळवणुकीतून सुटका केली होती.त्यांच्या या कामगिरीचे राज्यभर कौतुक झाले होते.