वादग्रस्त पीआय सचिन वाझे यांची बदली, कोणालाही पाठीशी घालणार नाही - गृहमंत्री

मुंबई - 'अँटिलिया' बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) करीत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा व त्यांच्या पत्नीच्या जबाबाचा तपास हा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करीत आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून अन्यत्र बदली करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालणार नसून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारचे कायम प्राधान्य राहिले आहे. कायद्याची चैाकट मोडणाऱ्या दोषींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारने कायम प्राधान्य दिले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षात वाढ झालेली नसल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्था (एनसीआरबी) च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या जिल्ह्यातील जवेली खुर्द येथे गेल्या ५४ वर्षांत पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. एकूण 535 गावांच्या 325 ग्रामपंचायतींसाठी शांततापूर्ण निवडणुका पार पडल्या, असे गृहमंत्री म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रसाद लाड, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, सुरेश धस, महादेव जानकर, विनायक मेटे, डॉ. परिणय फुके, अमोल मिटकरी, गोपिकिशन बाजोरिया, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !