नाशिक - शहरातील नाशिक रोड येथील नाशिक महसूल आयुक्त कार्यालयातील अजब कारभाराचे दर्शन आज 'याची देही, याची डोळा' अनुभवयास मिळाले. त्यामुळे या कार्यालयात 'हम करे सो कायदा' असे समजणाऱ्या काही कर्मचाऱयांच्या खुलेआम मनमानी कारभार 'आयुक्त साहेबां'च्या निदर्शनास आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची या कार्यालयात कशी अडवणूक, पिळवणूक आणि आर्थिक 'लूट' होते हे उघड झाले आहे.
त्याचे झाले असे, ज्या कागदपत्रांची साक्षांकित नक्कल दोन दिवसांपूर्वी घेतली, त्याच कागदपत्रांची साक्षांकित नक्कल आज घेतली तर दोन्हीसाठी चक्क वेगळी-वेगळी फी आकारण्याचा 'प्रताप' या कार्यालयातील अभिलेख विभागातील अव्व्ल कारकून निंबा भट आणि कनिष्ठ लिपिक दळवी यांनी केल्याने या कार्यालयाची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली.
काम एकच, फी वसुली मात्र वेगवेगळी
शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात काही कागदपत्रांच्या साक्षांकित नकला मिळण्यासाठी नाशिक महसूल आयुक्त कार्यालयातील अभिलेख विभागात (रेकॉर्ड रूम) मी गेल्या आठवड्यात अर्ज केला होता.
मंगळवारी (१६ मार्च) रोजी येथे येऊन मी रोख फी भरून (पोहोच पावती घेऊन ) साक्षांकित कागदपत्रे घेऊन आलो. त्यानंतर पुन्हा अर्ज करून तेव्हडीच कागदपत्रे आज पुन्हा घेतली. तर मला असे आढळून आले की दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कागदपत्रांसाठी २१६ रुपये २० पैसे (प्रत्यक्षात २१७ रुपये दिले) आकारले.
तर आज दुपारी घेतलेल्या तेव्हढ्याच कागदपत्रांसाठी १२२ रुपये ४० पैसे एव्हढी फी आकारण्यात आली. मग, परवाची फी योग्य, की आज घेतलेली फी कायदेशीर, असा संभ्रम मला पडला.
उप-आयुक्तांनी दिल्या कारवाईच्या सूचना
एकाच कामासाठी वेगवेगळी फी आकारल्याने माझा पुरता गोंधळ ऊडाला होता. त्यामुळे हा गोंधळ दूर करण्यासाठी ही बाब मी सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त प्रवीणकुमार देवरे यांच्यासमोर मांडली. हा प्रकार पाहून त्यांचेही डोळे चक्रावून गेले.
ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ दखल घेत याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुढील योग्य ती कारवाई होईलच. पण, सरकारी कार्यालयात सर्व सामान्यांची हेळसांड करणाऱ्या अशा काही निवडक निर्ढावलेल्या कर्मचारी, अधिकाऱयांचे करावे तरी काय?
पहातो तर या कर्यालयाबाहेरील लॉबीत दिवसाढवळ्या ट्यूब लाईट्स ( उत्कृष्ट व्हेंटिलेशन आणि प्रखर उन्हाळ्याचे दिवस असतानाही) सुरु होत्या. यावर कडी म्हणून की काय भट बसतात त्यांच्या बाजूच्या टेबलवरील त्यांचे कनिष्ठ कारकून दळवी हे तर त्यांच्यावरील फॅन तसाच चालू ठेऊन (दुपारी २ ते ३.40) जेवायला गेले होते. याशिवाय बाहेर लोंबीतील फॅनीप विनाकारण चालूच होता.
वास्तविक पाहता अव्व्ल कारकून आपल्या कनिष्ठ कारकुनाची काम करू शकत होता. ते सोपेही होते. फक्त शिक्का मारायचा आणि पावती भरून पैसे घ्यायचे. मात्र त्यासाठी अशा पद्धतीने जनतेला विनाकारण ताटकळत उभं ठेवणं कितपत योग्य आहे ?