मुंबई: सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला असताना राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी करण्यात येणार आहेत.
सरकारने जाहीर केलेले नवे दर पाच वर्षांसाठी लागू असणार आहेत. त्यानुसार घरगुती वीज दर 5 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे. या नवीन वीज दराबाबत राज्य वीज नियामक आयोगाचे शिक्कामोर्तब केलेे आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन राज्य वीज नियामक आयोगाने केले आहे. नवे दर 1 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
आयोगाने जी दर कपात जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातील विविध संवर्गासाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. त्यानुसार महावितरणचे घरगुती वीज दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
वीज दरातील कपात अशी...
मुंबईत बेस्टचे घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होणार आहेत. उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि मुंबईत अदानी आणि टाटा कंपन्यांचे वीज दरही कमी होणार आहेत. घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होतील. या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी कमी होणार आहेत.