सोलापूर : मोहोळ (सोलापूर) ताल्यक्यातील सय्यद वरवडे गाव ग्रामपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची पहिली बैठक घेण्यास मज्जाव करत नवनिर्वाचित सरपंचालाच बेदम मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद वरवडेच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची प्रक्रिया गेल्या २३ फेब्रुवारीला पार पडली होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत परस्पर विरोधी दोन्ही पॅनलना काट्यावरच बहुमत मिळाले आहे. या नंतर जुळवाजुळवीच्या राजकारणात सरपंच म्हणून वाल्मिकी जालिंदर निळे यांची तर उपसरपंच म्हणून पमाबाई शंकर कोरे यांची बहुमताने निवड झाली होती.
गावात ग्रामपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सदस्य येत असताना सरपंचांना 'तू मिटींगला आत जायचे नाही' म्हणत गावगुंडांनी ग्रामपंचायतीच्या दारातच सरपंच वाल्मिकी निळे यांना बेदम मारहाण केली. याचवेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आली.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम,सोमनाथ विलास विरपे आणि बाळू भिवा कदम या पाच जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.