मुंबई : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शेतकऱयांच्या थकीत वीज बिलाबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी समाधानकारक आणि मोठा धाडसी निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकर्याना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट देण्याची महत्त्वाची घोषणा आज अर्थसंकल्पाद्वारे केली. राज्यातील ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज जाहीर केला. शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात सूट ही आजची सर्वात मोठी घोषणा ठरली आहे. मागील काही दिवसांपासून थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी व शेतकरी संघटनांनी राज्य सरकारला घेरले होते.
शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर कारवाई म्हणून कृषी पंपाची वीज तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. मागील आठवड्यातच वीज तोडण्यास स्थगिती देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती.
थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, थकबाकीच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम मार्च २०२२ पर्यंत भरल्यास ५० टक्के अतिरिक्त माफी देण्यात येणार आहे. या अंतर्गत ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ रकमेच्या ६६ टक्के, म्हणजेच अंदाजे ३० हजार ४११ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.