मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 33 हजार 799 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. ही माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. मागील वर्षी 2020 मध्ये अशा विविध उपक्रमांमधून राज्यात एक लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, असे त्यांनी सांगितले.
मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.
चालू वर्षात जानेवारी महिन्यात 20 हजार 713 बेरोजगारांना तर फेब्रुवारी महिन्यात 13 हजार 086 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.