मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. मनसुख हे बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
मनसुख हिरेन यांनी आपली मानसिक स्थिती ठीक नाही, असे पत्र मुंबई व ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र मनसुख यांनी आत्महत्या करणे शक्यच नाही, असा दावा त्यांची पत्नी व मुलाने केला आहे.
हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सापडला तेव्हा त्यांच्या अंगावर कोणतेही व्रण नव्हते, असेही ते म्हणाले. हिरेन चांगले जलपटू होते. ते आत्महत्या करणार नाहीत, वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे.
तपास 'एटीएस'कडे वर्ग
या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत. विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे तथ्यांच्या आधारे हा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथका (एटीएस) कडे सोपवण्याची घोषणा केली आहे.