यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा अक्षरशहा हादरून गेला. कारण या हत्याकांडातील आरोपींच्या यादीत राज्यातील एका आघाडीच्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक बाळ बोठे हा मुख्यसूत्रधार असल्याचे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
३० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील सुप्याजवळील जातेगाव घाटात भररस्त्यात अतिशय निर्दयीपणे रेखा जरे यांचा गळा चिरून अगदी फिल्मीस्टाईल हे हत्याकांड घडले आणि अहमदनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपासाची चक्रे फिरविली.
राज्यभर रवाना केलेल्या विविध पथकांनी अथक दूरचा प्रवास करत, चोख कामगिरी बजावत अवघ्या काही तासांच्या आत आरोपीना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. दोन दिवसात तब्ब्ल पाच आरोपीना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत 'आयटी सेल'ने खड्या सारखे आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन राज्यातील विविध भागातून आरोपी गजाआड करण्यात केले, हे विशेष.
मात्र ज्यावेळी या हत्याकांडाचा मास्टरमाइंड हा बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आणि पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यानंतर बोठेला ताब्यात घेताना मात्र पोलीस यंत्रनेची चांगलीच दमछाक झाली.
पहिल्या पाच आरोपीना अतिशय शिताफीने आणि नियोजनबद्धरितीने ताब्यात घेणारी 'टीम अहमदनगर पोलिस' बोठे ला अटक करण्यात अयशस्वी झाली ही बाब कर्तव्यदक्ष अहमदनगर पोलिसांना 'हिरो' मानणार्या भाबड्या जनतेच्या काहीकेल्या पचनी पडायला तयार नाही.
कारण या गुन्ह्यातील पाच आरोपी हे जिल्ह्यातुन आणि पर जिल्ह्यातून पाचशे किलोमीटर दूरवरून कोल्हापूरहून ताब्यात घेतले. ते देखील काही तासांच्या आत. मात्र, चाकूने हल्ला झाल्यानंतर रेखा जरे यांना ऍम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात आणले त्यावेळी आणि जरे यांना मृत घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित असणारा आरोपी मुख्यसूत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या हातून निसटला, हे कोडे काही केल्या सुटायला तयार नाही.
यानंतरही पोलीस शिताफीने तपासाची चक्रे फिरवतील आणि बोठे ला गजाआड करतील, असा विश्वास जनतेला होता. मात्र, या निर्घृण हत्याकांडाला तीन महिने उलटूनही आरोपी बोठे अद्याप फरार आहे.
इतर पाच आरोपी प्रथम पोलीस कोठडीत आणि तेथून न्यायालयीन कोठडीत गेलेत. त्यांचे चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात दाखलही केलय. या प्रकरणात आतापर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया झाली आणि उर्वरित होईलही... पण...
एव्हढा कालावधी उलटूनही आपल्या आईच्या खुनातील मुख्य सूत्रधारास पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे पाहून हताश झालेल्या रुनाल जरे याने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आरोपी बोठेला लवकर अटक करा, अशी मागणी केली.
याशिवाय ऍड. सुरेश लगड यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आरोपी बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी (यातील मुश्रीफ आणि पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या रेखा जर या पदाधिकारी होत्या, हे विशेष.) केली आहे. त्यावर या तिन्ही मंत्री महोदयांनी पोलीस बोठेला लवकरच अटक करतील असा विश्वास दिला होता.
तथापि, पालकमंत्री मुश्रीफ यांनी तर पोलिसांना बोटेच ठावठिकाणा लागला आहे. ठिकाण सांगणे उचित ठरणार नाही. इतपर्यंत सांगून लवकरच बोठे गजाआड असेल, असा विश्वास दिला होता. मात्र अहमदनगर पोलिसांना अद्याप बोटेच ठावठिकाणा लागलेला नसल्यामुळे राज्यातील या तिन्ही बड्या मंत्री महोदयांचा शब्द खरा ठरू शकलेला नाही.
एकूणच पोलिसांना बोथेला गजाआड करण्यात येत असलेल्या अपयशामुळे अद्याप आरोपी बोठे फरार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अहमदनगर पोलीस हतबल झालेत. त्यामुळे आई ला गमावलेला मुलगा पिडीत रुनाल जरे यास कर्तव्यदक्ष पोलिसांच्या जीवावर 'शब्द' देणारे दस्तुरखुद्द तिन्ही मंत्रीमहोदय यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागलीय.