अहमदनगर - पाच वर्षांपूर्वी नगर औरंगाबाद महामार्गावर ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण करून लुटणार्या चार दरोडेखोरांना नेवासे न्यायालयाने दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अजय भाऊसाहेब चव्हाण, सागर अर्जुन मोहिते, अजय भिमराज माळी (सर्व रा. वळण पिंप्री, ता. राहुरी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्यायालयासमोर हजर केले. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे आणि पथकाने या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
दिनांक ३ जुलै २०१६ रोजी मध्यरात्रीचे वेळी नगर औरंगाबाद हायवे रोडवरील पंजाबी ढाब्याच्या ठिकाणी (झापवाडी शिवारात) हायवेने जाणारा मालट्रकचा चालक व क्लिनर यांना इंडीका कारमधील ४ चोरट्यांनी अडवले. ट्रकचा डॅश लागला, असे सांगून नेवासा फाट्यापासुन ट्रकचा रस्ता लूटीचे इराद्याने पाठलाग केला.
ट्रकचालकाने पंजाबी ढाव्याचे पंटागणामध्ये भितीपोटी ट्रक वळवली. इंडिका कारमधील चोरट्यांनी चालक व क्लिनर यांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण केली. हातातील लाकडी दांडे, गलोलीचे खडे अशा शस्त्रांनी डोक्यात हातापायांवर मारहाण करुन गंभीर जखमी करुन ट्रकमधील व चालक - क्लीनर यांच्या खिशातील एकुण १२ हजार ६० रुपये व १ हजार ५०० रु. किमतीचा फोन बळजबरीने चोरुन ट्रकची तोडफोड व नुकसान केली. त्यानंतर इंडिका कारसह घटनास्थळाहुन चोरटे मुद्देमालासह पसार झाले.
या घटनेनंतर तातडीने ढाबा चालक जगन्नाथ उत्तम चौहान यांनी दोन्ही जखमी यांना औषधोपचाराकरिता नगरला रवाना केले व घटना समक्ष पाहिली असल्याने घटनेबाबत सोनई पोलीस ठाण्यात अनोळखी दरोडेखोरांविरुद्द तक्रार दिली. त्यावरुन सोनई पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे पोलिस कॉन्स्टेबल काकासाहेब मोरे, विट्ठल थोरात यांच्या पथकाने केला. या तपासामध्ये अल्पशा काळातच गुन्हा उघडकीस आणून आरोपीना ताब्यात घेतले. आरोपीनी गुन्हा केल्यानंतर कॅशची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न केले. तसेच आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न करून त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल हस्तगत केला.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचे समोर आले. ती कार त्यांनी हिंजवडी (पुणे) येथे हायवे रोडवर चालकला गंभीर जखमी करुन इंडिका कारची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.
याच वाहनाचा वापर आरोपीनी या गुन्हयात केल्याचे तपासात समोर आले. ही इंडीका कार तपासात जप्त केली. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पाच वर्षांनी या गुन्ह्यात शिक्षा सुनावली गेली आहे.